हिमायतनगर प्रतिनिधी/ हदगाव हिमायतनगर तालुक्यात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मोठा पाऊस होऊन अतिवृष्टी झाली. परिणामी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी याकरिता आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचा विराट मोर्चा निघाला होता. आता याचं संदर्भात विविध मागण्या घेऊन आ. जवळगावकर यांनी नुकतीच जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली.
यावेळी काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील रुईकर, हिमायतनगर तालुका अध्यक्ष गजानन सूर्यवंशी, जिल्हा काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष सुभाष राठोड शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष आत्माराम पाटील वाटेगावकर, नागोराव सूर्यवंशी, दिलीपराव पाटील, संदीप पाटील, श्याम पाटील, सतीश खानसोळे, विक्रांत शिंदे, जनार्दन मुंगल, ज्ञानेश्वर पाटील आदी उपस्थित होते.
आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना खरीप २०२४ अग्रीम २५ टक्के पिक विमा देण्यासंदर्भात मागणी केली होती. त्या अनुषंगाने आठ दिवसात अधिसूचना काढणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले असल्याने शेतकरी बांधवात समाधान व्यक्त केल्या जात आहे. त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानी संदर्भातही सरसकट मदती करिता जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्याचबरोबर पैनगंगा, कयाधू तसेच अनेक गावातून वाहत असलेले ओढे, नाले क्षेत्रातील १०० टक्के नुकसानग्रस्त
झालेल्या बहुतांश गावात अद्याप पीक विमा कंपनीने पंचनामे केले नाहीत. यासंदर्भात आ. जवळगावकर यांनी जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा केली असता जिल्हाधिकारी यांनी या संदर्भात जर पिक विमा कंपनीने पंचनामे केले नाही तर आम्ही प्रशासकीय स्तरावर केलेले पंचनामे कंपनीला
लागू करावेच लागतील, असे स्पष्ट सांगितले. नदीकाठच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना कारखान्याने ऊस तोडणी वेळी प्राथमिकता द्यावी, यासंदर्भात कारखान्यांना पत्रद्यावे, अशी मागणी आ. जवळगावकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
आ. जवळगावकरांनी केली कृषी मंत्र्यांकडे नुकसान भरपाईची मागणी
हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकयांचे प्रचंड नुकसान झाले. परिणामी शेतकरी आर्थीक संकटात सापडला. त्यामुळे मतदार संघात सरसकट नुकसान भरपाई मिळावी, यासाठी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी कृषी मंत्र्यांची भेट घेवून मतदार संघात झालेल्या अतिवृष्टी संदर्भात चर्चा करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी करत पीक विमा कंपनीने पीक विमा परतावा दिला नसून तो देण्यासंदर्भात आदेशीत करावे, अशीही मागणी आ. जवळगावकरांनी केली आहे.
