हिमायतनगर प्रतिनिधी/ गेल्या तिन दिवसापासून तालुक्यात परतीच्या पावसाने कहर केला असल्याने काढणीला आलेल्या सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन अनेक शेतकऱ्यांनी काढलेले सोयाबीन पाण्याखाली अडकले असल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांना परतीच्या पावसाने रडवले असल्याचे चित्र आहे. तर बोरगडी शिवारात विज पडून एक म्हैस दगावल्याची घटना घडली आहे.
हिमायतनगर तालुक्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. त्यानंतर देखील पाऊस सुरूच असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. सोयाबीन सह कापूस, या पिकांचे नुकसान झाले आहे. आता शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणीला सुरुवात करताच अचानक पावसाने हजेरी लाऊन शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे.
दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असल्यामुळे शेतकऱ्यांनी काढलेले सोयाबीन पाण्याखाली अडकले असल्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहेत. बोरगडी येथील शेतकरी नागोराव राजाराम काईतवाड यांनी नेहमी प्रमाणे त्यांच्या गट क्रमांक (१८६ ) मध्ये म्हैस चारण्यासाठी सोडली होती. दि 13 आक्टोबर रोजी दुपारी अचानक झालेल्या विज कडाडून म्हैस जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. या शेतकऱ्यांना तहसील प्रशासनाकडून मदत करण्याची मागणी केली आहे.
