हिमायतनगर प्रतिनिधी/ तालुक्यात शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारपीटीचा तडाखा बसला असून मोठ्या प्रमाणात गारपीट होऊन शेतकऱ्यांच्या शेतातील हाळद, भोयसेंग,टरबुज ,उन्हाळी सोयाबान, ज्वारी यासह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
हिमायतनगर तालुक्यातील धानोरा, मंगरूळ, वारंगटाकळी, बोरगडी, बोरगडी तांडा, सिरपली, शेलौडा, एकंबा,डोल्हारी, यासह अन्य गावात वादळी वाऱ्यासह पावसाने गारपीटीचा तडाखा होऊन शेतकऱ्यांच्या शेतातील गहू, हरभरा, तिळ, भोयसेंग, ज्वारी, हाळद, टरबूज ,उन्हाळी सोयाबीन यासह अन्य पिकांचे झालेल्या गारपीटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यात या वर्षी पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची हातची पिके गेली आहेत.
तर उन्हाळ्यात देखील निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. शनिवारी तालुक्यातील अनेक गावांना पाऊस वादळी वाऱ्यासह गारपीटीचा तडाखा बसला आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. सायंकाळी आणखी ढगाळ वातावरण निर्माण झाले होते . विजांचा कडकडाट होत असल्यामुळे रात्रीच्या वेळी पाऊस होणार असल्याचे वातावरण निर्माण झाले होते. तालुक्यात गारपीटी झालेल्या भागाचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रशासनाकडून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
प्रशासनाने तातडीने पंचनामे करावे
वादळी वारे, पाऊस व गारपिटीने हिमायतनगर तालुक्यात झालेल्या नुकसानाबाबत तहसीलदार यांच्याशी चर्चा केली असून. लवकरच झालेल्या हानीचा आढावा घेण्यात येणार असून. शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत अशा सुचना केल्या असल्याचे आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी बोलतांना सांगितले आहे.
